web-banner-lshep2024

Breaking News

कल्याण तालुका पोलिसांची दमदार कामगिरी; खुनाचा गुन्हा उघडकीस, दोन आरोपी जेरबंद

 

गौरव शेलार /  कल्याण : कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका अनोळखी व्यक्तीच्या खुनाचा गंभीर गुन्हा स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि कल्याण तालुका पोलिसांनी संयुक्त तपासातून अवघ्या काही दिवसांत उघडकीस आणत दोन आरोपींना अटक केली आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे ठाणे ग्रामीण पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दि. २८ जून २०२६ रोजी कल्याण–अहिल्यानगर मार्गावरील मामणोली गावाच्या हद्दीतील जंगल परिसरात एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला होता. पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जंगलात टाकण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. याप्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ४२८/२०२६ दाखल करण्यात आला.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड आणि अपर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल यांनी घटनास्थळी भेट देत तपासासाठी आवश्यक सूचना दिल्या. त्यानंतर मुरबाड उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लाड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दादासाहेब एडके आणि कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकेश ढो यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र तपास पथके तयार करण्यात आली.

तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे मृताची ओळख किशोरेंद्र कार्तिक साहू (वय ४२, रा. देवगाव, ता. मुरबाड) अशी पटली. तो मुरबाड येथील मिंडा कंपनीत काम करत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तपासाची दिशा निश्चित करून पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला.

सखोल चौकशीअंती सोरेश विश्वनाथ गोळे (वय २४, सध्या रा. रायता, ता. कल्याण, मूळ रा. तळवली बारागाव, ता. मुरबाड) आणि ज्ञानेश्वर दत्तात्रय कंठे (वय २८, रा. कनिवली, पो. माजगाव, ता. मुरबाड) यांनी मिळून हा खून केल्याचे उघड झाले. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून दोघांनी किशोरेंद्र साहू यांची हत्या करून मृतदेह जंगलात फेकल्याची कबुली दिली. तसेच मृताच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरल्याचेही तपासात निष्पन्न झाले. दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना २४ जुलै २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

या गुन्ह्याचा उलगडा करण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक मंजुषा शिरसाट, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय नलवडे, पोलीस उपनिरीक्षक महेश कदम, पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक जयवंत वारा, पोलीस उपनिरीक्षक श्याम आरामठकर, पोलीस हवालदार सतीश कोळी, गोविंद कोळी, हेमंत विखुटे, पोलीस शिपाई सचिन बोडके, सुरेश शिंदे, प्रशांत बडगे, हरिश्चंद्र झांजे, भास्कर भोंडीर, रोशन लोणे, मुस्ताफा शेख, सुरेश सावंत, सुनील फसाटले, अतुल खडसकर, योगेश निंबळे, कुणाल बावदाने, अजित काळे, युवराज कोळी, रामा शिंदे, राजेश विभुते, रवींद्र मोरे आणि दिपक गायकवाड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लाड, पोलीस निरीक्षक दादासाहेब एडके आणि पोलीस निरीक्षक मुकेश ढो यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या कारवाईमुळे कल्याण तालुका पोलिसांनी आणखी एक गंभीर गुन्हा यशस्वीपणे उघडकीस आणत उत्कृष्ट तपास कौशल्याची प्रचिती दिली आहे.

 

No comments