धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा, ‘कॉकरोच’ला सरकार घाबरलं; विद्यार्थ्यांचा प्रचंड विजय!
Dharmendra Pradhan
Resignation : गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या जंतर-मंतरवर सुरू असलेल्या कॉकरोच जनता
पार्टी अर्थात सीजेपीच्या आंदोलनाला प्रचंड मोठे यश
मिळाले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर राजीनामा दिला
आहे. काहीही झालं तरी जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही, अशी भूमिका
सीजेपीने घेतली होती. तरुणांनी आपले आंदोलन मागे घ्यावे यासाठी केंद्र सरकारने हर
तऱ्हेने प्रयत्न केले. परंतु त्यात यश आलेच नाही. सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके
यांना टायफाईड झालेला असला तरी त्यांनी मैदान सोडले नव्हते. त्याचाच परिणाम म्हणून
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्याचे बोलले जात आहे.
कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला दिवसेंदिवस पाठिंबा वाढत होता. कला, शिक्षण, मनोरंज
क्षेत्रातूनही तरुणांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला जात होता. हे आंदोलन
संपवण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा यांनी सोनम वांगचूक यांची भेट
घेतली होती. तसेच सीजेपीच्या प्रतिनिधींचीही त्यांनी भेट घेतली होती. अगोदर आम्ही
कोणत्याही आंदोलक विद्यार्थ्यावर कारवाई करणार नाही, सर्व
गुन्हे मागे घेऊ असे केंद्र सरकारने सांगितले होते. तसेच नीट पेपरफुटीचा खटला हा
जलदगती न्यायालयात चालवला जाईल, असेही खुद्द पंतप्रधान मोदी
यांनी जाहीर केले होते. या आश्वासनानंतर सोनम वांगचूक यांनी आपले उपोषण सोडले
होते. परंतु दुसरीकडे जंतर मंतरवर आंदोलन करत असलेल्या सीजेपीने मात्र आंदोलन कायम
राहील. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे, अशी
ठाम भूमिका घेतली होती.
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामा पत्रात नेमकं
काय?
धर्मेंद्र
प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर आपल्या सोशल मीडिया खात्यावर एक पत्र पोस्ट केले
आहे. ही पोस्ट त्यांनी तरुणांना उद्देशून केली आहे. मी
चार दशकांहून अधिक काळ विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण
सुधारणेसाठी समर्पित आहे. माझा नेहमीच विश्वास राहिला आहे की एक मजबूत, सर्वसमावेशक आणि दूरदृष्टी असलेली शिक्षण व्यवस्था ही एका सशक्त
राष्ट्राचा पाया आहे. मी देशातील तरुणांच्या आकांक्षा, भावना
आणि रास्त अपेक्षांचा मनापासून आदर करतो, असे प्रधान
म्हणाले. तसेच भारताच्या तरुण पिढीची स्वप्ने साकार करणे ही आपल्या सर्वांच्या
राजकीय आणि सामाजिक जीवनातील एक नैतिक वचनबद्धता राहिली आहे. पंतप्रधानांच्या
दूरदर्शी नेतृत्वाखाली देशाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार
व्यक्त करतो, असेही प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर म्हटले
आहे.



No comments