web-banner-lshep2024

Breaking News

मोठी बातमी : केदारनाथमध्ये महाराष्ट्रातले 120 जण अडकले, युद्धपातळीवर बचावकार्य सुरु

मुंबई: Kedarnath Rain and Landslide update : उत्तराखंडमध्ये 31 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे टिहरी जिल्ह्यातल्या घनसाली आणि केदारनाथ धाम पायवाटेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. केदारनाथ धाम ते गौरीकुंड भागातील हजारो नागरिक आणि स्थानिक दुकानदार या भागात अडकले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातल्या 120 जणांचा समावेश आहे. महाडमधील 10 जणांचा अडकलेल्यांमध्ये समावेश आहे.

या पावसामुळे केदारनाथमधील लिनचोली, बडी, लिनचोली, भीमवाली, गौरीकुंड आणि सोनप्रयागपर्यंतचा रस्ता जागोजागी तुटला आहे. त्यामुळे या परिसरात हजारो नागरिक अडकले होते. त्यांना वाचवण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. आत्तापर्यंत 10000 पेक्षा जास्त जणांना वाचवण्यात आलंय. पण, अजूनही 1 हजार जण अडकल्याची माहिती आहे. या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टरचाही वापर करण्यात येत आहे.

आत्तापर्यंत 17 जणांचा मृत्यू

उत्तराखंडमध्ये 31 जुलैपासून झालेल्या पावसामध्ये आत्तापर्यत 17 जणांचा मृत्यू झालाय. केदारनाथ धाम परिसरात एनडीआरएफ ,एसडीआरएफ, पोलीस, अग्निशमन दल, यांच्यासह वेगवेगळ्या सरकारी यंत्रणेमधील 850 पेक्षा जास्त कर्मचारी मदतकार्यासाठी तैनात आहेत. यात्रेकरुंच्या सुटकेसाठी वायूसेनेचीही मदत घेतली जात आहे. वायू सेनेच्या चिनूक आणि M17 हेलिकॉप्टरसह पाच नागरी हेलिकॉप्टरचाही बचाव कार्यासाठी वापर करण्यात येत आहे. केदारनाथमधील मोबाईल आणि वीज सेवा सुरु करण्यात आली आहे. ज्या नागरिकांना आपल्या कुटुंबीयांशी संपर्क साधायचा आहे ते इंटरनेट कॉलिंग किंवा व्हॉट्सअप कॉलिंगच्या माध्यमातून संपर्क करु शकतात, अशी माहिती उत्तराखंड आपत्कालीन विभागाचे सचिव विनोद सुमन यांनी दिली. केदारनाथमधील नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून तिथं 15 ते 20 दिवसांचे अन्नधान्य आणि औषध ठेवण्यात आली आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

No comments