web-banner-lshep2024

Breaking News

गुरू म्हणजे केवळ मार्गदर्शक नव्हे, तर संघर्षाच्या वाटेवरचा आधारवड! ‘भिऊ नकोस,मी तुझ्या पाठिशी आहे’या एका वाक्याने दिलेले बळ आयुष्यभर विसरता येणार नाही...

    

     

मुरबाड/कुणाल शेलार : गुरूपौर्णिमा हा केवळ गुरूंचे पूजन करण्याचा दिवस नाही, तर आपल्या आयुष्याला दिशा देणाऱ्या, अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या आणि संकटाच्या काळात खंबीरपणे आपल्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या व्यक्तीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. आयुष्यात अनेक माणसे भेटतात, काही क्षणभर सोबत करतात, काही स्वार्थासाठी जवळ येतात; मात्र जे संकटाच्या काळातही हात सोडत नाहीत, पडताना सावरतात आणि ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठिशी आहे’ असे ठामपणे सांगतात, तेच खरे गुरू आणि खरे मार्गदर्शक असतात.माझ्या आयुष्यात असेच गुरू,मार्गदर्शक आणि आधारवड म्हणून सदैव खंबीरपणे उभे राहिलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे माझे गुरूवर्य, मार्गदर्शक आणि आदरणीय आमदार मा.श्री.किसनजी कथोरे साहेब.

        जीवनाच्या वाटचालीत संघर्ष कमी नव्हता. अनेक प्रश्न होते, अनेक आव्हाने होती आणि अनेकदा पुढची दिशा स्पष्ट दिसत नव्हती. मात्र अशा प्रत्येक वळणावर साहेबांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी केवळ राजकारण किंवा समाजकारणाची दिशा दाखवली नाही, तर माणूस म्हणून जगताना सत्याची कास कशी धरावी, संघर्ष कितीही मोठा असला तरी न डगमगता त्याचा सामना कसा करावा आणि समाजासाठी काम करताना स्वतःपेक्षा समाजहिताला महत्त्व कसे द्यावे, हे शिकवले.

      त्यांच्या एका शब्दाने आत्मविश्वास मिळाला, त्यांच्या एका धीराच्या वाक्याने संकटाशी दोन हात करण्याची ताकद मिळाली आणि त्यांच्या आशीर्वादाने समाजात एक युवा म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्याची प्रेरणा मिळाली. माझ्या आयुष्यातील सुख-दुःखाच्या प्रत्येक क्षणी त्यांनी दिलेली साथ ही माझ्यासाठी केवळ मदत नव्हती, तर ती माझ्या जीवनप्रवासाची मोठी शिदोरी होती.

        आज मी आणि माझी धर्मपत्नी सौ.मयुरी कुणाल शेलार यांनी गुरूपौर्णिमेच्या पावन दिनी आमच्या गुरूवर्यांचे दर्शन घेऊन त्यांचे शुभाशिर्वाद घेतले.त्या क्षणी मनात अनेक आठवणी दाटून आल्या.आयुष्याच्या या प्रवासात ज्यांनी विश्वास ठेवला,ज्यांनी पाठबळ दिले आणि ज्यांनी समाजात उभे राहण्याची संधी दिली, त्या गुरूंच्या चरणी कृतज्ञतेने नतमस्तक होणे,यापेक्षा मोठे भाग्य कोणते?

          आजच्या स्वार्थाच्या आणि धावपळीच्या युगात नात्यांची व्याख्या बदलत असताना, गुरू-शिष्याचे नाते मात्र आजही तितकेच पवित्र आहे. कारण हे नाते अपेक्षांवर नाही,तर विश्वासावर उभे असते. गुरू मार्ग दाखवतो;पण त्या मार्गावर चालण्याचे धैर्य शिष्याला स्वतःच्या आचरणातून सिद्ध करावे लागते. त्यामुळे गुरूंच्या आशीर्वादासोबत त्यांच्या विचारांची आणि संस्कारांची शिदोरी घेऊन पुढे जाणे, हीच खरी गुरुदक्षिणा असते.

        गुरूवर्य आमदार किसनजी कथोरे साहेबांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास आणि दिलेले मार्गदर्शन ही माझ्या जीवनातील सर्वात मोठी ताकद आहे. त्यांच्या आशीर्वादामुळेच समाजासाठी काहीतरी चांगले करण्याची प्रेरणा मिळते. आज गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने त्यांच्या चरणी एकच प्रार्थना—आपला आशीर्वाद आणि मार्गदर्शन सदैव असेच लाभत राहो आणि आपल्या विचारांच्या प्रकाशात समाजहिताची वाटचाल करण्याचे सामर्थ्य आम्हाला मिळो.कारण आयुष्याच्या वाटेवर कितीही मोठे वादळ आले, कितीही संकटे उभी ठाकली, तरी पाठीशी गुरूंचा आशीर्वाद आणि डोक्यावर त्यांचा हात असेल,तर संघर्षाची भीती वाटत नाही.

        माझ्यासाठी गुरू म्हणजे केवळ एक व्यक्ती नाही; गुरू म्हणजे माझ्या जीवनाचा विश्वास, संघर्षातील बळ, सत्याच्या वाटेवरील प्रकाश आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर उभा असलेला माझा आधारवड! गुरूवर्य आमदार मा.श्री.किसनजी कथोरे साहेबांना गुरूपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा आणि चरणी कोटी कोटी प्रणाम!

No comments