'राजकारणात एक तर मी राहीन, नाहीतर फडणवीस राहतील'
मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवाय मोदी आणि शहांनाही आव्हान देत डिवचले आहे. या पुढच्या काळात राजकारणात एक तर मी राहीन नाही तर,फडणवीस राहतील असा इशाराच त्यांनी दिला. रंगशारदा येथे शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते. मला आणि आदित्यला जेलमध्ये टाकण्याचे षडयंत्र फडणवीसांनी रचले होते. आपण शांत बसलो, पण आता शांत बसणार नाही. हे आव्हान मी त्यांना शिवसैनिकांच्या जोरावर देत आहे, असे ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.
ठाकरेंनी फडणवीसांना घेरले
उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टिका केली. घरं फोडली, पक्ष फोडले पण त्यातूनही त्यांच्या हाती काहीच लागले नाही. हिंदुत्व सोडलं असा संभ्रम निर्माण केला जात आहे. तोडाफोडा आणि राज्यकरा ही मोदी शहांची निती आहे. न खाऊंगा न खाने दूंगा असे म्हणणारे खा खा खातात असा आरोपही त्यांनी यावेळी केला. पंचवीस वर्षे युतीत होतो पण त्यांनी त्याचा गैरफायदा घेतला. भाजपम्हणजे चोर मंडळी आहेत. मोदींची भाषण म्हणजे रोमांच वाटायची. पण आता त्यांची किव येते. आपल्या आयुष्यातील परीक्षा घेणार हे शेवटचं आव्हान आहे. ते यशस्वी पणे आपल्याला पेलाचे आहे. मला आणि आदित्यला जेलमध्ये टाकण्याचा डाव फडणवीसांचा होता. पण त्यांना आताच सांगतो या राजकारणात एक तर ते राहातील नाहीतर मी राहीन असे थेट आव्हानच त्यांनी फडणवीसांना दिलं आहे.
एकनाथ शिंदेंवरही हल्लाबोल
यावेळी बोलताना ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांच्यावर हल्लाबोल केला. अनेक चोर लोक ग्रामिण भागात बाळासाहेबांचा फोटो वापरत आहेत. बाळासाहेबांचा धनुष्यबाण असाही प्रचार करत आहेत. त्यांच्या प्रचाराला भूलू नका. सध्या गोंधळाचे वातावरण आहे. त्यामुळे मशाल घराघरापर्यंत पोहोचवा. मशाल हे आपलं चिन्ह आहे. आपल्या बरोबर अनेक जाती धर्माचे लोक मोठ्या ताकदीने येत आहेत. लोकांच्या मनात सध्याच्या सरकार आणि पक्ष फोडी बाबत प्रचंड राग आहे. त्यामुळे आगामी काळात आपली सत्ता येणार, ती आणणारच असे ठाकरे म्हणाले.



No comments