web-banner-lshep2024

Breaking News

विशाळगड हिंसाचाराची ' सीआयडी ' चौकशी करा - आमदार रईस शेख


मुंबई  : विशाळगड आणि परिसरात हिंदुत्ववादी संघटनांनी केलेल्या हिंसाचाराची राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत (सीआयडी) चौकशी करण्यात यावी. या हिंसाचारातील दंगेखोरांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात यावे. आणि पिडीतांना १५ दिवसाच्या आत नुकसाभरपाई द्यावी, अशी मागणी आमदार रईस शेख यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदनाव्दारे केली आहे. आमदार शेख यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन विशाळगड हिंसाचार प्रकरणाची चर्चा केली आणि त्यासंदर्भातले आपल्या मागणीचे निवेदन सादर केले. यासंदर्भात बोलताना आमदार शेख म्हणाले की, विशाळगड आणि पायथ्याच्या परिसरातील अतिक्रमण बाब न्यायप्रविष्ठ आहे. तरीसुद्धा हिंदुत्ववादी संघटनांनी  'चलो विशाळगड' अशी पुणे, सातारा आणि सांगली जिल्ह्यातील हिंदुत्ववादी संघटनांची हाक होती.१४ जुलै रोजी विशाळगड पायथ्याशी गाजीपुर गाव आणि मुस्लिम वाडीवर हल्ला करण्यात आला. मुस्लिम समुदायाची घरे, दुकाने आणि मोटार गाड्यांची जाळपोळ आणि नासधूस करण्यात आली.

याप्रकरणी २१ दंगेखोरांना अटक झाली असून शाहूवाडी पोलीस ठाण्याच्या ४ गुन्हे दाखल आहेत. या दंग्यामध्ये ५०० पेक्षा अधिक दंगेखोरांचा सहभाग असून मूळ सूत्रधार मोकाट आहेत, असा आरोप आमदार शेख यांनी केला.विशाळगड हिंसाचार जिल्हा पोलिस अधीक्षक समोर घडल्याने स्थानिक पोलिसांवर मुस्लिम समुदायाचा विश्वास राहिला नाही. म्हणून या प्रकरणाची राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी ) विभागाकडून चौकशी करण्यात यावी. या हिंसाचारामध्ये २ कोटी ८४ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा जिल्हा प्रशासनाचा अंदाज आहे. यासंदर्भात तातडीने पंचनामे करून १५ दिवसाच्या आत पिडीतांना भरपाई द्यावी आणि दंगेखोरांना त्यांच्या जिल्ह्यातून तडीपार करण्यात यावे, अशा मागण्या आमदार शेख यांनी केल्या आहेत.

No comments